Monday, August 10, 2015

एक नज्म

कुदरत भी क्यां करती, के मिलावट का जमाना हैं
धूप में घुल के ही बारिशों क़ो आना हैं 

इन्सानों की फ़ितरत भी कुछ हैंवानों की तरफ़ हैं 
मालिक से दुआ करते हैं के क़ातिल को बचाना हैं 

दरिंदों की इस भीड़ में कहलाते हैं वो "ऊँचे"
दोज़ख से भी नापाक जिनका घराना हैं 
[दोज़ख = hell]

वाईज़ को भी देखूँ तो कैसे कहूँ सच्चा 
शैतान के घऱ बारहा उसका आना-जाना हैं 
[वाईज = a preacher, a Moralist
 बारहा = frequently]

अमन का तो बस एक दिन चाहे हैं "कलाम"
ख़ून से लिपटा अखबार तो रोजाना हैं 




Saturday, August 8, 2015

धोकादायक

कृष्णा निवास इमारत कोसळली. १२ जण मरण पावले.

मिडिया: मिडिया ला २ दिवसांचे content मिळाले. ब्रेकिंग न्यूज, विश्लेषण, चर्चा, परिसंवाद आणि "पीडितां"च्या मुलाखती…. भरपूर कार्यक्रम…. भडक मथळे झळकले, संतापून सवाल विचारले गेले, "तुम्हाला बघवणार नाही, बघू नका" असे सांगत न बघवणारी दृश्ये खुशाल दाखवली गेली… TRP वाढला. 

महानगरपालिका: झोपलेले अधिकारी दचकून जागे झाले…. रात्रभर राबले… मिटींगा झाल्या… आदेश निघाले…जुने नियम नव्याने घोकले गेले…जुन्याच अधिकाऱ्यांच्या नव्या टीम्स बनवून शहरात चारही दिशांना पिटाळल्या  गेल्या… जुन्याच नोटीसा नव्याने बजावण्यासाठी. 

सरकार: महानगरपालिकेकडे वैतागून विचारणा झाली. कमिशनरवर प्रश्नांची सरबत्ती झाली. शहराच्या नगररचनेचा पुन्हा एकदा अभ्यास करण्याचा निर्धार झाला. 

विरोधी पक्ष: सरकारला पोटभर दोष देवून झाला. प्रश्नाला मालक विरुद्ध भाडेकरू असा रंग उगाचच दिला गेला. इतक्या गंभीर प्रसंगी सुद्धा Vote Bank ला भुलवण्याचा प्रयन्त झाला. 

सामान्य नागरिक: आश्चर्य, भय, दुःख, कणव, हताशपण आणि आपली Insurance Policy तपासून बघण्याचा पुनर्निर्धार अशा भावना अनुक्रमाने येउन गेल्या. 

प्रकरण संपल्यात जमा झाले. 

या सगळ्या कल्लोळात हे पूर्णपणे ignore केले गेले की या इमारतीतील रहिवाश्यांना तब्बल १० वर्षांपूर्वीच "इमारतीतून बाहेर पडा, यापुढे इथे राहू नका" अशा नोटीसा दिल्या गेल्या होत्या.  

इमारत धोकादायक होती हे तर खरेच. पण त्याहीपेक्षा धोकादायक हे आहे की कायद्याने आपली भूमिका बजावली नाही. कोणीतरी सतत १० वर्षे कायदा मोडत राहिले आणि कायद्याचे रक्षक (!) शांतपणे बघत बसले (wrong side ने २-wheeler वाले गाडी नेत असताना सुद्धा ट्राफिक पोलिस शांतपणे बघतात तसेच). 

रहिवाशांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न का झाला नाही? पोलिसांनी काय केले? महापालिकेने रहिवाशांना एका अती धोकादायक इमारतीत सुखाने १० वर्षे का राहू दिले? त्यांचे पाण्याचे कनेक्शन खंडित का केले नाही? विजेचे कनेक्शन महावितरण ने खंडित का केले नाही? मीटर रीडर १० वर्षे ह्या अती धोकादायक इमारतीच्या आतमधे जाऊन शांतपणे रीडिंग घेत राहिले??? गेल्या २ वर्षात महापालिका, राज्य आणि केंद्र अशा सर्व स्तरावरच्या निवडणुका होऊन गेल्या. सरकारी कर्मचारी (याद्या तपासण्यासाठी) आणि राजकारणी लोक (मते आजमावण्यासाठी) घरोघरी जाऊन आले. तसेच ते ह्या घरांमध्येही जाऊन, भेटून, बोलून आले असतील. कोणालाच काही करावेसे वाटले नाही???

त्या इमारतीपेक्षाही अती धोकादायक जर काही असेल तर ते हे की कायद्याचे पालन करण्याची तत्परता कोणीच दाखवली नाही. आणि ह्याही पेक्षा धोकादायक काही असेल तर ते हे की "जागल्या ची भूमिका बजावणारे" म्हणून सदा न कदा मिरवणाऱ्या मिडिया ने वरील पैकी कोणताही प्रश्न कोणालाही विचारला नाही. 

सगळेच एकमेकांना सांभाळून घेत पुढे जातायत बहुतेक. असो ! कालाय तस्मै नमः !!




Saturday, August 1, 2015

श्री जगन्नाथपुरी - एक नवल 

वास्तविक पाहता ईश्वर हा निर्गुण आणि निराकार. पण आपले  हे निर्गुण निराकार स्वरूप आपल्या भक्तांना समजायला अवघड, मग ते आपले स्वरूप जाणून कसे घेणार, आपली प्राप्ती कशी करून घेणार या कळकळीपोटी देवाने सगुण रूप धारण केले. मग भक्तांनी त्याला आपल्या भक्ती-प्रेमाने अनेक अवतारात कल्पिले, त्याच्या मूर्ती घडविल्या, मंदिरे उभारली. त्या मूर्ती शतकानुशतके जपल्या, पुजल्या, शृंगारल्या. त्या मूर्तीच्या शिवाय ते देवस्थान ही कल्पना सुद्धा आपण करू शकणार नाही इतक्या त्या मूर्ती आणि ती प्रतीके एकजीव होवून समाज-मनात रुजल्या.

म्हणूनच जेंव्हा ओरिसा मधील 'पुरी' तीर्थक्षेत्रीच्या श्री जगन्नाथ मंदिरातील मूर्ती दर काही वर्षांनी गाभाऱ्यातून काढून, विसर्जून त्या ऐवजी तिथे पूर्णपणे नवीन मूर्ती स्थापल्या जातात हे समजले तेंव्हा धक्काच बसला !

जगन्नाथपुरी हे ओरिसा मधील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्री जगन्नाथाचे भक्त जगभर पसरलेले. ह्या क्षेत्री आणि ह्या देवावर लोकांची अपार श्रद्धा. म्हणून जेव्हा भुवनेश्वर ला जायचा योग आला तेंव्हा तेथून जवळच असलेल्या पुरी ला जाऊन यायचं ठरवलं. स्थानिक मित्र लगेच म्हणाले की दोन महिन्यांनंतर आला असतात तर पाऊल ठेवायला ही जागा मिळाली नसती. कारण श्री जगन्नाथाचे 'नव-कलेवर' पर्व (स्थानिक उच्चार "नब-कलेबर") सुरु होत आहे. ह्या  पर्वाचे महत्व अनन्य साधारण आहे आणि साधारण ३० लाख भक्त त्या छोट्याश्या 'पुरी' गावात दाखल होणार आहेत !

नव-कलेवर मधील कलेवर चा अर्थ पार्थिव शरीर, नष्ट होणारे मर्त्य शरीर. विष्णू संप्रदायामधील काही शास्त्रांचे असे मानणे  आहे की शरीर जीर्ण झाल्यावर आत्मा जसा त्या शरीराचा त्याग करून दुसरे शरीर धारण करतो त्या प्रमाणे देवाच्या जुन्या, जीर्ण मूर्ती देखील  बदलून नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. ज्या मूर्ती लाकडापासून बनलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत हे शास्त्र विशेष पाळले जाते. आणि पुरी क्षेत्री च्या जगन्नाथाची मूर्ती देखील अशीच लाकडापासून बनलेली आहे.

जगन्नाथपुरी मध्ये होणार्या ह्या "नब-कलेबर" उत्सवाची प्रथा आणि त्या मागची प्रक्रिया फार रंजक आहे.

हे मंदिर साधारण १२०० वर्षांपूर्वी बांधलेले. मुख्य मंदिरात मूर्ती तीन - सर्वात उजवीकडे श्री जगन्नाथ (श्री कृष्णाचा नववा अवतार), मध्ये बहिण सुभद्रा आणि डावीकडे बलभद्र (बलराम). ह्या मूर्ती धातूच्या किंवा दगडाच्या नसून लाकडाच्या बनलेल्या असतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नवीन मूर्ती स्थापन करण्यास अधिक आषाढ हा अतिशय सुयोग्य काल असतो (अधिक आषाढ म्हणजे ज्या वर्षात आषाढ महिना हा अधिक महिना येतो तो मास). असा अधिक आषाढ साधारण १२ ते १९ वर्षांनी येत असल्याने मूर्ती बदलण्याचा उत्सव साधारण १२ ते १९ वर्षांनी होतो. मागील उत्सव १९९६ साली झाला होता. म्हणजे आज ज्या मूर्ती मंदिरात आहेत त्या १९९६ साली नवीन बसवल्या गेल्या आहेत.

मूर्ती फक्त कडुनिंबाच्या झाडाच्याच बनवण्याचा दण्डक आहे. आता नवीन मूर्ती बनवायच्या म्हणजे त्यासाठी लाकडाची सोय लावणे आले ! त्यासाठी योग्य असा निंबवृक्ष शोधण्याचे काम चैत्र महिन्या पासून (म्हणजे ४ महिने आधीपासूनच) सुरु होते. काही ठराविक भक्तमंडळींना हा अधिकार असतो. अश्या लोकांचा एक चमू व्रतस्थ अवस्थेत पायी हिंडत निंबवृक्ष शोधायला सुरुवात करतो. दिवसचे दिवस आणि रात्र-रात्र रानी-वनी हिंडतो.

नक्की कुठला वृक्ष 'देव' घडवायला वापरायचा ह्याचे निकषही फार कडक आहेत. हा वृक्ष असा हवा ज्यावर कुठल्याही पक्षांची घरटी असू नयेत किंवा त्यांच्या वास्तव्याच्या खुणा असू नयेत. ह्या वृक्ष्याच्या फांद्याही ठराविक संख्येच्याच हव्यात. वृक्षावर शंख, चक्र, गदा आणि पद्म हि विष्णू ची शुभचिन्हे उमटलेली असावीत. आणि मुख्य म्हणजे वृक्ष्यापाशी एखाद्या भुजंगाचा वास असावा ! मी हे सर्व ऐकूनच चक्रावलो आणि असे वृक्ष मिळणार तरी कुठे आणि किती ह्या काळजीत पडलो ! कारण असा एक वृक्ष सापडून भागणार नाही…. श्री जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा ह्यांच्या मूर्ती साठी प्रत्येकी एक आणि शिवाय सुदर्शन चक्रासाठी चौथा असे एकंदर चार वृक्ष लागणार !

पण भक्तांची काळजी देवाला ! असे म्हणतात की वृक्षाचा शोध करत जेंव्हा भक्त मंडळी रानोवनी फिरत असतात तेंव्हा देवी स्वप्नात येउन भक्तांना दिशादर्शन करते आणि "ह्या दिशेला जाऊन शोधा म्हणजे वृक्ष सापडेल" असा दृष्टांत देते….

मी पुरी ला पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशीच्या Times of India मधे 'सुदर्शन चक्र' बनवण्यासाठी चा पहिला वृक्ष सापडल्याची बातमी आली आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरला !  टीव्ही वरही हीच breaking news चालू होती. वृक्ष्याच्या बुंध्याशी नाग आढळल्याचाही उल्लेख बातमीमध्ये होता.

वृक्ष सापडल्यानंतर तो तोडणे ही फार विधिवत होते…. आधी त्या वृक्षापाशी यज्ञयाग होतात, प्रसादाचे वाटप होते …. त्यानंतर सोने व चांदीने बनवलेल्या कुर्हाडीने त्या वृक्षावर काही हलके आघात केले जातात (symbolic आघात) आणि मग साध्या कुऱ्हाडीने वृक्ष तोडला जातो.

जेंव्हा सुदर्शन चक्रासाठीचा वृक्ष सापडल्याची बातमी आली तेंव्हा लगेचच त्याच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागली…. पोलिसांना barricades लावून ती जागा सील करावी लागली. लोक प्रसादाची ताटे घेऊन त्या वृक्षापाशी झुंबड करायला लागले. जगन्नाथाप्रती लोकांची श्रद्धा किती तीव्र आहे त्याचा अनुभव आला.

तर असे चार वेगवेगळे वृक्ष शोधून झाले की ते कापून एका विशिष्ठ जागी आणले जातात आणि तिथे त्यांच्या मूर्ती घडवल्या जातात. मूर्ती घडवायची दंतकथा अशी की एक राजा-राणी होते. राणी ला श्री जगन्नाथाची मूर्ती करून त्याची पूजा अर्चा आणि सेवा करावी अशी इच्छा झाली. तिने एका वयोवृद्ध मूर्तीकाराला पाचारण केले. मूर्तिकाराने अशी अट घातली की मी एका सदनात दारे खिडक्या लावून माझे काम करणार, मला कोणीही disturb करायचे नाही आणि काम पूर्ण व्हायला साधारण १ महिना लागेल. राणी कबूल झाली. मूर्तीकाराने काम सुरु केले. पण ८-१० दिवसांनंतर आतमधून काहीच हालचाल ऐकू येईना तशी राणीची उत्कंठा वाढली ! राणीने दरवाजा उघडून बघायला सांगितले. पाहतात तो काय - मूर्ती अर्धवट झाल्या होत्या आणि त्या वृद्धाचे निधन झाले होते ! आता ह्या अर्धवट मूर्तींचे काय करायचे ह्या द्विधा मनस्थितीत राणी असताना श्री जगन्नाथाने दृष्टांत देवून राणीला सांगीतले कि "तू ह्या अर्धवट घडविलेल्या मूर्तींचीच स्थापना कर. मूर्तीला हात नाहीत… मी माझ्या दोन भक्तांमध्ये दावे-उजवे करणार नाही. ह्या मूर्तीला कान, नाक तोंड काही नाही… त्यामुळे मी जे घडेल आणि डोळ्यांना दिसेल त्यावरच विश्वास ठेवेन. आणि तुम्ही सर्वही जीवनात असेच वागत चला." राणी संतोष पावली आणि मूर्तींची स्थापना आणि पूजा अर्चा झाली.

जेंव्हा नव-कलेवर पर्वात जुन्या मूर्ती बदलून नवीन मूर्ती स्थापतात, तेंव्हा एक गुप्त विधी असतो. जुन्या कलेवरातील आत्मा नवीन कलेवरात घालण्याचा !! हा विधी करण्यासाठी जवळपासच्या गावातून एका वृद्ध व्यक्तीचीच निवड केली जाते…. कारण असे सांगतात की आज पर्यंत ज्या-ज्या व्यक्तीने आपल्या हाताने हे प्राण-संक्रमण केले आहे त्या व्यक्तीचे १५ दिवसातच निधन झाले आहे ! खरे-खोटे तो एक जगन्नाथच जाणे !

हे सांगणे न लगे की जगन्नाथ यात्रेचा रथ सुद्धा दर वर्षी नव्याने बनवला जातो. दर्शनाला मंदिरात जाण्याच्या वाटेवर मोठमोठ्या वृक्षांचे बरेच ओंडके रस्त्याच्या कडेला आणून ठेवलेले दिसले. ते ह्याच कामासाठी.

इतक्या कथा आणि दंतकथा ऐकल्यावर मंदिर पाहण्याची आणि दर्शन घेण्याची फार उत्सुकता लागली होती ! मंदिर खरोखर फार सुंदर आणि कलाकुसरींनी भरलेले आहे. एका मोठ्या प्रांगणात अनेक मंदिरे आहेत - गणपती, कृष्ण, शारदा, लक्ष्मी इत्यादींची. आणि एक मुख्य मंदिर आहे श्री जगन्नाथाचे. बरेच लोक मूळ मंदिराचे, गाभाऱ्यातील जगन्नाथ, सुभद्रा इ, चे दर्शन फार लांबून घेत होते. लोक जवळ जाऊ नयेत ह्या साठी एक अडसरवजा वासा आडवा लावून ठेवला होता. असे का? हा प्रश्न विचारल्यावर असे समजले की मंदिराचे बांधकाम जेंव्हा झाले तेंव्हा गाभारा आणि त्याच्या आजूबाजूला पाया रचताना १,००० शाळीग्राम (एक प्रकारचा दगड, ज्याचे हिंदू पूजा-अर्चनेमध्ये महत्व फार आहे) तळाशी रचले होते. शाळीग्राम हे  सुद्धा देवाचेच एक रूप मानून त्याची नित्य पूजा करण्याचा प्रघात हिंदुस्थानात अनेक ठिकाणी अहे. त्यामुळे अशा शालीग्रामाला ओलांडून, त्याचा अपमान करून आपण देवदर्शन कसे घ्यायचे? अशी स्थानिकांची भावना असते. म्हणून जगन्नाथाचे दर्शन लांबूनच घेण्याचा सल्ला आम्हाला देण्यात आला. (हे १,००० शाळीग्राम त्या वेळच्या नेपाळ-नरेशाने दिले होते. म्हणून आज जगन्नाथाचे दर्शन घेताना इतर कोणालाही आपले मानाचे शिरस्त्राण (पगडी, फेटा इत्यादी) उतरवून मगच दर्शन घ्यावे लागते. परंतु नेपाळच्या राजाला मात्र हा नियम लागू नाही !)

मंदिराच्या आजूबाजूला दगडी फरसबंदीचे प्रांगण आहे. तिथे एका बाजूला रांगेने काही कनाती लावून त्यामधे काही अन्न शिजवण्याचे काम सुरु होते. जगन्नाथाची आरती झाल्यानंतर प्रसादाचा काही भाग ह्याच शिजवलेल्या अन्नामध्ये मिसळला जातो आणि येणाऱ्या सर्व भक्तांना हे अन्न प्रसाद म्हणून दिले जाते. हे अन्न शिजवून माफक किमतीमध्ये प्रसाद म्हणून विकणारे खरे तर खाजगी व्यावसायिक आहेत. परंतु खापराच्या मडक्यांमध्ये विस्तवावर शिजवलेला तो प्रसाद अमृतासारखा लागला ! शिवाय  मनामधे श्री जगन्नाथाच्या दर्शनाची गोडी होतीच !

तर असे हे कथा, उपकथा आणि दंतकथांनी भरलेले आणि भारलेले श्री जगन्नाथपुरी चे तीर्थक्षेत्र…. कधी जायचा योग आला तर चुकवू नका :)

















Monday, January 19, 2015

।। काकडा ।।


                

उठा गुरुवरा, करुणागारा उषःकाल झाला
पुण्यपदांचे  दर्शन घ्याया भक्तचमू जमला    ।। १ ।।

निद्रा त्यजुनी आसन सोडा, मुख ही प्रक्षाला
सुवासिनींनी तयार केला दुग्धाचा पेला      ।। २  ।।

उष्णोदक अन सुगंध द्रव्ये स्नानाचा थाट
गुरुकीर्तीगुणगान कराया किती तिष्ठले भाट   ।। ३ ।।

गंधपुष्प सौभाग्यद्रव्यमय स्वीकारावी पूजा
स्वहित साधण्या गुरुसेवेहून मार्ग नाही दुजा    ।। ४ ।।




Saturday, December 27, 2014

मायानगरी, तुला सलाम !!

(Something about this poem - those who have been to London (and to Central London, in particular) will agree that you feel an urge to visit  it again and again. Why this urge? Why this craving to visit that place? What pulls you there to that mystique experience? Is it the opulence of the place? Or the style statements of the big fashion labels? Or the magic of artworks in the Museums? Or is it just in the air? May be, all of it together....I have tried to capture it in the words below)


दिवस असो वा सांज कोवळी
अथवा रजनी काजळ काळी
सहा ऋतू अन बारा मासी
सदा झगमगे इथे दिवाळी
उल्हासाने सदा उधाणत इथले मार्ग तमाम
मायानगरी तुला सलाम !

किती मनोहर किती अप्रतिम,
सौंदर्याचे मोहक  विभ्रम
भू-लोकी वा इंद्रपुरी मी
असा कुणाही पडेल संभ्रम
वळणा-वळणावरी भेटती इथे रती-अन-काम
मायानगरी तुला सलाम !

काव्य शास्त्र अन सजीव शिल्पे
जे-जे मनुष्य स्वप्नी कल्पे
कलावंत जन इथे निर्मिती  
नाविन्याच्या शुभ-संकल्पे
सरस्वतीच्या शिरी चढविती नित्य नवीन ललाम
मायानगरी तुला सलाम !

[ललाम  = अलंकार ]

सभापटूची  वाकपटुत्वे
राजकारण्यांची कर्तृत्वे
धुरंधरांनी इथे रुजविली
लोकशाहीची तमाम तत्वे
एका ठायी नांदून गेले शांती अन संग्राम
मायानगरी तुला सलाम !

असेच येथे येत रहावे
कधी योजूनी कधी अचानक
पिउनी करावे इथला वारा
जडावलेल्या मनास हल्लक
हृदया मध्ये भरुनी निघावे इथुनी तृप्ती अनाम
मायानगरी तुला सलाम !


Saturday, December 29, 2012



Hi guys, I have composed this poem in tribute to the Delhi Girl:

~~~~ तेजस्विनी शलाका ~~~~



हि वेळ संगराची, आला प्रसंग बाका
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

हे रोजचेच घडते सारे तुम्हा समक्ष
सीता अनेक पडती लंकापतींस  भक्ष
ह्या वासनासूरांची लंका तुम्हीच फुंका
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

धर्मास नाही वाली ना कायदा समर्थ
सत्ताधीशांपुढे ह्या सारेच कर्म व्यर्थ
आता तुम्हीच द्यावा आधार एकामेकां 
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

निस्तेज कायद्याचे घडतील आप-सव्य
माझ्या पित्यास नेते देतील दान-द्रव्य
पण मोल इभ्रतीचे द्रव्यामधे तुळे का??
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

"झडतील नित्य जेथे सन्मान दुहितांचे
घडतील नित्य तेथे सहवास देवतांचे" **
विसरू नका कधी ह्या प्राचीन पुण्यश्लोका
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

[** यत्र नार्याः पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवतः ]


Tuesday, August 28, 2012

आरती फेसबुक ची !!

I have written an आरती (in Marathi) on nothing else but Facebook ! :)) The idea is to acknowledge its prowess and ubiquitous nature in a poetic way :))

See if you like this...

आरती फेसबुका (चाल - "आरती ज्ञानराजा")

आरती फेसबुका । आणी सकळां समीपां 
टिकविशी नातेबंध । जोडूनिया एकमेकां 
आरती फेसबुका.... ।। १ ।।

कितिएक सखे चांगले । पोटासाठी पांगले 
तुझिया गुणसुखे । पुन्हा सारे एकवटले 
आरती फेसबुका.... ।। २ ।।

अफाट या जगती । क्रिया अचाट घडती 
तुझिया सहवासे । क्षणामाजी समजती 
आरती फेसबुका.... ।। ३ ।।

रोजचेच कर्तव्य । किंवा काही शुभकार्य 
तुला आठविणे आता । झाले आहे अनिवार्य 
आरती फेसबुका.... ।। ४ ।।

सामर्थ्य तुझे श्रेष्ठ । सर्वांहुनी बलिष्ठ 
बुडविशी महासत्ता । क्रूर आणि गर्विष्ठ 
आरती फेसबुका.... ।। ५ ।।

आता इतुकी प्रार्थना । सर्वव्यापी पावना 
तुझ्या कृपे करुनी । वाढो शांती-सद्भावना 
आरती फेसबुका.... ।। ६ ।।